ठाणे : विकासकांकडून शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची प्रकरणे ताजी असतानाच रेमंड येथिल शासकीय जमिनीवरील नाला बुजविल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवली आहे. यामुळे विधान परिषदेत ठाण्यातील नाल्यांचा प्रश्न गाजणार असल्याचे बोलले जात आहे.
रेमंड कंपनीच्या मालकीच्या जमिनीलगत असलेल्या नाल्यामध्ये मातीचा भराव टाकून तेथे भूखंड तयार करुन नैसर्गिक प्रवाह बदल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे या नाल्याचे मूळ आराखडे, नकाशा, आणि बदललेल्या प्रवाहाचे छायाचित्र, नाल्यात भराव टाकल्याची तारीख, त्याचे फोटो, कोणत्या व्यक्तीने वा संस्थेने भराव टाकला, त्याला दिलेली परवानगी, विना परवानगी नाला बुजवला असल्यास त्याच्यावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याचबरोबर पर्यावरण विभाग, महसूल आणि ठाणे महापालिका शहर विकास विभागाने काय कारवाई केली, याचा अहवाल श्री. दानवे यांनी मागितला आहे, त्यामुळे अनधिकृत बांधकामे आणि त्याचबरोबर नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याच्या प्रकारांबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.