भाजप लोकसभेच्या २६ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी २२ जागा लढणार
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर फुटणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली.आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी 22 जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित करण्यात आले आहे. प्रस्तावित जागांवर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपावर लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर फुटणार आहे. नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे.
अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. जर एखाद्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या उमेदवाराचा आपल्या पक्षाचा उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करतील. हा नियम भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा 40 ते 42 जागांवर विजय निश्चित आहे. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. 2019 च्या निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीत भाजपच्या कामगिरी बदल झालेला असेल, असे देखील फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या मतदारसंघांचे सर्व्हेक्षण झाले असून मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला मतदारांची पंसती आहे याचे कल हाती आले आहेत. आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. 2019 साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणे ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.