ठाण्याची गृहीथा विचारे ठरली भारताची सर्वात लहान पर्वतारोहक

ठाणे : ठाण्यातील अवघ्या ११ वर्षांच्या गृहीथा विचारे हिने आपल्या धाडसाने आणि सातत्यपूर्ण मेहनतीने देशाच्या पर्वतारोहण क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे.
आजवर भारतात आणि परदेशात मिळून ९० हून अधिक ट्रेक्स व मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करत गृहीथाची ओळख भारताची सर्वात लहान पर्वतारोहक म्हणून निर्माण झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये १० वेळा, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एकदा तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून तीन अप्रिसिएशन पुरस्कारांच्या स्वरूपात घेण्यात आली आहे.
सन २०२२ मध्ये अवघ्या आठव्या वर्षी गृहीथाने नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मीटर) यशस्वीरीत्या गाठत भारतातील दुसरी सर्वात लहान मुलगी म्हणून विक्रम केला. त्यानंतर २०२३ मध्ये टांझानियातील माऊंट किलीमांजारो (५,८९५ मीटर) सर करत तिने ‘फास्टेस्ट चाइल्ड टू समिट’ हा मान पटकावला. २०२४ मध्ये मलेशियातील माऊंट किनाबालू (४,०९५ मीटर) आणि अझरबैजानमधील माऊंट बाजर्दुझू (४,४६६ मीटर) या शिखरांवर सर्वात लहान भारतीय पर्वतारोहक म्हणून तिची नोंद झाली. २०२५ मध्ये हिमाचल प्रदेशातील केदारकंठा शिखर (३,८०० मीटर) सर करत तिने सर्वात लहान भारतीय मुलगी म्हणून आणखी एक यश संपादन केले. याच वर्षी माऊंट युनाम (६,१११ मीटर) मोहिमेदरम्यान तिने ५,८५० मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली आहे.
गृहीथाच्या पुढील आंतरराष्ट्रीय मोहिमांसाठी प्रायोजकत्व व सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, तिच्या या प्रवासामुळे देशातील तरुणांना साहस क्रीडा आणि पर्वतारोहणासाठी प्रेरणा मिळत आहे. गृहीथाच्या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अधिक उंचावण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.