…तरच शहर प्रदुषणमुक्त होईल-आ. संजय केळकर

ठाणे : सर्वंकष स्वच्छता मोहिम ही व्यक्तीपासून समूहापर्यत सुरू ठेवली तरी निश्चितच ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता मोहिम आज माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली. यावेळी श्री.केळकर यांनी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.

या मोहिमेत प्रभागातील सफाईसोबतच मंदिरे तसेच मंदिर परिसरही झाडलोट करुन पाण्याने स्वच्छ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तायडे, अनघा कदम तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी झाले होते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहिम संपूर्ण देशभर सुरू आहे. ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता अभियान सुरू आहे. ही स्वच्छता मोहिम केवळ एक दिवसाची नसून ती गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि पुढे देखील सुरू राहणार आहे. शहर स्वच्छ असले की वातावरण देखील प्रदुषणमुक्त असते, माणसाचे मन देखील स्वच्छ राहते. महात्मा गांधीजीनी सुरू केलेल्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीचे स्वरुप दिले असून ही मोहिम प्रत्येक व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच आपले ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

माजिवडा-मानपाडा या ठाणे महापालिका क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या प्रभाग समितीत राबविण्यात आली. सकाळी 6.30 वाजल्यापासून या मोहिमेस सुरूवात करण्यात आली. माजिवडा नाशिक हायवे, साईनाथनगर लोढा कॉम्प्लेक्स, यशस्वीनगर प्रभागसमिती ते शिवाजीनगर, दादलानी बाळकुम नाका ते साकेत रोड, ढोकाळी, हायलॅण्ड रोड ते राममारुती नगर, कोलशेत लोढा आमारा/ कोलशेत वरचा गाव, तत्वज्ञान विद्यापाठी, पातलीपाडा, मानपाडा, मनोरमा नगर ढोकाळी, आझादनगर, ब्रह्मांड/ काबरासर्कल, पातलीपाडा- इंदिरापाडा, डोंगरीपाडा/ वामननगर, तुर्फेपाडा, बाघबीळ गाव रोड, वाघबीळ नाका, कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा, गायमुख, जैनमंदिर, गरीबनगर ओवळा, भाईंदरपाडा / नागलाबंदर, गायमुख, तानसा पाईपलाईन तसेच या परिसरातील नाले तसेच परिसरातील सर्व अंतर्गत व मुख्य रस्त्यांची झाडून साफसफाई करण्यात आली तसेच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले.

माजिवडा-मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदाने, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विर्सजन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर खालील भाग आदी ठिकाणी देखील सफाई करण्यात आली.

याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. यावेळी शिवमंदिर, आशापुरा देवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आदी मंदिरे तसेच मंदिराचा परिसर झाडलोट करुन पाण्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच, रस्त्यावर उभी असलेली सुमारे १७ भंगार वाहनेही हटविण्यात आली आहेत. या स्वच्छता मोहिमेत मंदिराच्या सफाईसाठी विहिरींचे पाणी वापरण्यात आले. तसेच रस्ते सफाईसाठी जेटींग मशीन करता पुर्नप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला.

या मोहिमेत महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग, विविध सामाजिक संस्था तसेच एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग होता.