ठाणे: वन विभागाने (कांदळवन) ठाण्याच्या खाडीला नवसंजीवनी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत साधारण १.८० हेक्टर जागेत तब्बल आठ हजार खारफुटीची रोपे लावली जाणार आहेत.
ठाणे शहराला २७ किमी लांबीचा खाडी किनारा लाभला असून, या खाडीत हिरवाईचं नैसर्गिक कवच म्हणून कांदळवन उभं आहे. मात्र ठाणे पूर्वेकडील मीठबंदर रोड व स्वामी समर्थ मठ परिसरात गेल्या काही वर्षांत रानटी वेली आणि झुडपांचा प्रचंड फैलाव झाला होता. त्यामुळे कांदळवनाच्या वाढीस अडथळा निर्माण झाला आणि खाडीच्या पर्यावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला. या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरातील अनावश्यक झाडझुडपे हटवून नव्या कांदळवन लागवडीची तयारी केली आहे. लवकरच आठ हजार खारफुटीची रोपे येथे जमिनीत रुजतील आणि पुढील काही वर्षांत ठाण्याच्या खाडीला एक नवं हिरवागार कवच प्राप्त होईल.
त्सुनामीनंतर संपूर्ण जगाला कांदळवनाचं खरं महत्त्व उमगलं. समुद्राच्या प्रचंड लाटा रोखणं, वादळांचा तडाखा कमी करणं, खाडीतल्या मासे-खेकड्यांना आश्रय देणं, स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य आणि निवासस्थान उपलब्ध करून देणं, खाडीच्या पाण्याचं नैसर्गिक शुद्धीकरण करणं अशा असंख्य जबाबदाऱ्या ही झाडं निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे पार पाडत असतात.
ठाण्याच्या खाडी किनाऱ्यावर कांदळवनाची लागवड ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी हिरव्या वारशाची निर्मिती आहे. या लागवडीमुळे खाडीच्या जैवविविधतेला चालना मिळेल आणि पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांनी दिली.