ठामपाने उभारले नाहीत शेल्टर, दवाखाने; निर्बिजीकरणाचीही बोंब

मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली श्वानप्रेमी एकवटले
ठाणे: सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे, वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बिजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ठाणे महानगर पालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेले नाहीत. तसेच, ठाणे महानगर पालिकेकडून एकही दवाखाना चालविला जात नसून निर्बिजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय, निर्बिजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचलले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न जटील होऊ लागला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एकवटले. रविवारी दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचे रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडे घातले. या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते.
मनोज प्रधान म्हणाले की, आपण स्वतः श्वानपालक आहोत. त्यामुळेच आपणाला प्राणीमित्रांच्या व्यथा माहित आहेत. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ-पिऊ घालत असतात. मात्र, समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येत असते. श्वानदंशाबाबत बोलले जात असले तरी हजार श्वानांपैकी एक श्वान चावला और उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आज जी समस्या निर्माण झाली आहे. त्यास फक्त आणि फक्त ठाणे महानगर पालिकाच जबाबदार आहे. आपल्याकडे निर्बिजीकरणाकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्यपद्धतीने होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आलेले नाहीत. एकीकडे निर्बिजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जातात. मात्र, ते परत सोडले जात नाहीत. मग, त्यांचे काय केले जाते? याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे.
दरम्यान, ठाणे शहरात 12,500 श्वान पालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या  निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्बिजीकरण, श्वानांसाठी दवाखाना,  शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले.