नक्षल कमांडर भूपतीसह ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : गडचिरोली पोलिस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या साठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं आहे. ही घटना काल मंगळवार १४ ऑक्टोबर रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात घडली.

पोलिसांच्या विश्वासार्ह सूत्रांनुसार, हे आत्मसमर्पण अत्यंत नियोजित आणि गोपनीय स्वरूपात पार पडले. वेणुगोपाल राव हा माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असून, देशातील माओवादी चळवळीतील एक कळीचा मेंदू मानला जात होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला असून, गडचिरोलीतील माओवादविरोधी कारवाईत हा ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची संपूर्ण माहिती सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोलीमधून माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. चाळीस वर्षे सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा आहे. पीपल्स वॉर ग्रुप स्थापन झाल्यानंतर या भागातील तरुणांच्या मनात असलेल्या व्यवस्थेबद्दल संशय निर्माण करण्यात आले आणि या व्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, म्हणून संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था उलथून लावली पाहिजे आणि त्याच्या पर्याय म्हणून आपण जंगलातून पर्यायी व्यवस्था चालवू असे खोटे स्वप्न दाखविले गेले. त्याला इथले काही तरुण बळी पडले. सोनू उर्फ भूपतीचे आत्मसमर्पण अत्यंत महत्त्वाचे आहे. तो पॉलीट ब्युरो मेंबर सेंट्रल कमिटी मेंबर तर आहेच, सोबतच गडचिरोली जिल्ह्यात माओवादी दल निर्माण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच होते.

भूपतीने या संपूर्ण भागात माओवादी चळवळीचा म्होरक्या म्हणून भूमिका बजावली आहे. मोदी सरकारने चोख धोरण राबविले, तीव्रतेने विकास केले आणि दुसऱ्या बाजूला माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास ही प्रोत्साहित केले. अमित शहा यांची गृहमंत्री म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली. गडचिरोली पोलिसांनी खासकरून c 60 ने ऑपरेशन राबविले. माओवाद्यांची भरती बंद करून दाखविले. पोलिस दल यासाठी स्तुतीस पात्र आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि त्यांची पूर्ण टीम खास अभिनंदनास पात्र आहे.

भूपतीसारख्या अतीवरिष्ठ आणि सुशिक्षित माओवादी, ज्याने आपल्या बौद्धिक गुणांनी संपूर्ण चळवळ उभी करून दाखवली. अशा माओवादी कमांडरला शस्त्रांसह आत्मसमर्पित करून दाखवणं हे देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब आहे. उत्तर गडचिरोली आधीच सशस्त्र माओवादापासून मुक्त झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये बोटावर मोजण्याइतके माओवादी शिल्लक आहेत. आता त्यांनीही आत्मसर्पण करावे अशी माझी त्यांना विनंती आहे. छत्तीसगडमध्ये लवकर मोठे आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे, असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे.