अनधिकृत वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये – आरटीओ

ठाणे : पालकांनी त्यांच्या पाल्यास कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत अथवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना करण्यात आले आहे.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूल, अंबरनाथ या शाळेतील शिशु वर्गातील विद्यार्थ्यांची वाहतुक करीत असताना व्हॅनचा (MH05FB4792) मागील दरवाजा उघडला गेल्याने भरधाव असणाऱ्या व्हॅनमधून तीन लहान मुले पडून गंभीर जखमी झाली. सदर व्हॅनच्या चालकाने बेदरकारपणे व निष्काळजीपणाने गाडी चालवून मुलास गाडीतून पडून जखमी होण्यास कारणीभूत झाला. त्यामुळे सदर वाहनचालकावर अंबरनाथ पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतुक केल्यामुळे सदर वाहनावर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलमानुसार चलान जारी करून दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करण्यात आले आहे.