ठाणे: भारताच्या दक्षिणेकडील वेलंकनी (नागापट्टनम) या ठिकाणी २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरवर्षी वेलंकनी मातेची यात्रा मोठ्या उत्सवात साजरी होत असते. या उत्सवासाठी संपूर्ण भारतातील ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, वसई, विरार व भाईंदर, उत्तन येथील ख्रिश्चन भाविक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. तेथे जाण्यासाठी दरवर्षी विशेष ट्रेन सुरु केली जाते. परंतु रेल्वे प्रशासनाने यावर्षी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने २७ ऑगस्ट २०२३ रोजी बांद्रा टर्मिनल वरून एक स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे आरक्षण पूर्ण झाल्याने रेल्वेचे तिकीट उपलब्ध होत नाही.
प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने २६ ऑगस्ट २०२३ रोजी बांद्रा टर्मिनसवरून आणखी एक वाढीव स्पेशल ट्रेन सुरू करावी. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने ८ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी वेलंकनी (नागापट्टनम) वरून श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर रेल्वे स्थानकादरम्यान विशेष ट्रेन सुरू करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारतला अखेर ठाण्यात थांबा
मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई येथून सोलापूर येथे जाणारी १० फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनला ठाण्यात थांबा मिळावा, अशी रेल्वे मंत्र्यांकडे खासदार राजन विचारे यांनी मागणी केली होती. या ठाणे शहराला जोडलेल्या नवी मुंबई व मीरा-भाईंदर शहरातील सोलापूर वासियांची संख्या अधिक असल्याने या शहरातील नागरिकांना ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानक हे सोयीचे होते. या रेल्वे स्थानकातून वंदे भारत या ट्रेनला थांबा मिळावा अशी मागणी पत्राद्वारे केली होती. ४ ऑगस्ट २०२३ पासून वंदे भारत ट्रेनला ठाण्यात थांबा मिळाल्याने खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्र्यांचे व प्रशासनाचे आभार मानले आहेत.