वाहतूक कोंडीवरून राजकीय पारा चढला
ठाणे : ठाण्यात एकाच वेळी सुरु असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांमुळे दररोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन ठाणेकरांना वाहतूककोंडीतून मुक्त करण्यासाठी १ जूनपर्यंत विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र नियोजनावर टीका करत सत्ताधाऱ्यांच्या वाभाडे काढले आहेत.
मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने ठाण्यातील केवळ रस्त्यांच्या कामांसाठीच पहिल्या टप्प्यात २१४ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३९१ कोटींचा निधी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला दिला आहे. एवढा भरघोस निधी मिळाल्यानंतर पालिका प्रशासनानेही एकाच वेळ रस्त्यांची कामे सुरु केली असून यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून यामधून मार्ग काढताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाण्यात असा कोणता रस्ता शिल्लक राहिलेला नाही जिथे वाहतूक कोंडी होत नाही. परिणामी १० मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल एक तास लागत असून ही रोजचीच डोकेदुखी झाली असल्याने या वाहतूक कोंडीचे करायचे काय ? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
या वाहतूक कोंडीच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकींनंतर सोमवारी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाचवेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, अशा आशयाचे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.
संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन केले आहे, असे काही दिसून येत नाही. हजारो कोटींचे रस्ते होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण, या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. 1 जून ते 1 ऑक्टोबरमध्ये कामे करता येत नाहीत, तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, याबाबत शंका आहे. ठाण्याच्या विकासासाठी आणलेले हजारो कोटी रुपये पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.