के. सी. गांधी हायस्कूलवर मात करत श्री माँ बाल निकेतन विजेता

एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप मंगळवारी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहात झाला. अंतिम सामन्यात श्री माँ बाल निकेतन संघाने के. सी. गांधी हायस्कूल संघावर तब्बल १७८ धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्री माँ बाल निकेतन संघाने ४५ षटकांत २५२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल के. सी. गांधी हायस्कूल संघ २३.३ षटकांत ७४ धावांतच गारद झाला.

स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार श्री माँ बाल निकेतनच्या आदित्य कौलगी याला देण्यात आला. त्याने संपूर्ण मालिकेत १७ गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सेंट जोसेफ हायस्कूल, डोंबिवलीच्या स्मित पोमेंडकर याचा गौरव झाला. तर मालिकावीर पुरस्कार श्री माँ बाल निकेतनच्या सार्थ पाटील याला देण्यात आला.

समारोप सोहळ्यास आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व ज्येष्ठ क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी, सदानंद केळकर, अतुल सुर्वे, उद्योजक विद्याधर वैश्यपायन आणि आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुलक्षण कुलकर्णी म्हणाले की, “वसंत डावखरे साहेबांमुळेच मला स्पोर्टिंग क्लबच्या वतीने पहिल्यांदा बाहेरगावी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या पाठबळामुळेच माझे क्रिकेटमधील करिअर घडले.” एन. टी. केळकर स्पर्धेला यंदा ४९ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत, ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम आंतरशालेय स्पर्धांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. येथून अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडल्याचा उल्लेख करत, उत्कृष्ट मैदान, प्रशिक्षक आणि पंच ही या स्पर्धेची बलस्थाने असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी स्पर्धेच्या सुवर्ण वर्षात (५० वे वर्ष) पुन्हा उपस्थित राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आमदार संजय केळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आणि आज ती ४९ व्या वर्षात पोहोचली आहे. ही देशातील पहिली अशी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असून, येथे कोणतीही नोंदणी फी किंवा पंच फी घेतली जात नाही. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून, आतापर्यंत जिल्हा,राज्य,आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ६५० हून अधिक खेळाडू या स्पर्धेतून घडल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या मुंबई क्रिकेटमध्ये ठाण्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याचा अभिमान व्यक्त करत, ठाणे हे गुणवंत खेळाडूंचा खजिना असल्याचे त्यांनी नमूद केले. विजेते व उपविजेते संघांचे अभिनंदन करत, पुढील वर्षी सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धेचा इतिहास उलगडून दाखवण्यासह अनेक माजी व विद्यमान खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.