महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती होणार?

महायुतीच्या चर्चेमुळे इच्छुकांना तिकीट कापण्याची भीती

ठाणे: नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. महायुती झाल्यास प्रभागात उमेदवारी मिळणार की नाही या चिंतेने त्यांना आतापासून ग्रासले आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या तीन पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील ही दरी अधिक वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदं यांना त्यांच्याच जिल्ह्यात घेरण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले. वनमंत्री गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मैदानात उतरले. ठाण्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेतला तर कल्याण, डोंबिवलीत शिंदे गटात फोडाफोडी सुरू केली. परिणामी दोन्ही पक्षांनी ठाणे जिल्ह्यातील बहूतेक सर्वच महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिला.

स्वबळाच्या हालचालीमुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकेर्त, पदाधिकारी यांच्या आशा, अपेक्षा वाढल्या. ठाणे महापालिकांचा विचार केला असता १३१ पैकी शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत ६६ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सुमारे ६० माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर पक्षप्रवेशांच्या धडाक्यानंतर ही संख्या ८०- ८५ च्या पुढे गेली आहे. याशिवाय घराणेशाहीतील पुढची पिढी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. अशी डझनभर नावे आहेत. तर तिकीट मिळेल या आशेवर प्रभाग बांधणारे डझनभर इच्छूकांचीही गर्दी आहे. म्हणजे एकट्या शिंदे गटातच आजच्या घडीला दिडशे उमेदवार निडणुकीसाठी सज्ज आहेत.

भाजपतही तिच अवस्था आहे. ठाणे महापालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. त्यादृष्टीने माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची मोट बांधण्यास सुरुवात झाली आहे. सध्यातरी ऑपरेशन ५५ इतकीच मर्यादा त्यांनी स्वत:ला आखून ठेवली आहे. पण महायुती झाल्यास जागावाटपाचे हे गणित जुळवताना पक्षांची खरी कसोटी लागणार आहे.

उदाहणार्थ शिवसेना शिंदे गटाकडे आजच्या घडीला ८५ माजी नगरसेवक आहेत. तर भाजपने ५५ नगरसेवक निवडून आणण्याची तयारी केली आहे. ही संख्याच १४० च्या पुढे जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत असल्याने त्यांच्यासाठीही जागा सोडाव्या लागणार आहेत. महायुती झाल्यास जागावाटपात अनेकांच्या नावांना कात्री लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत शिवसेना शिंदे गटाशिवाय पालिका निवडणूक जिंकणे अशक्य असल्याने भाजपने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुंबईत महायुती म्हणून लढताना इतर महापालिकांमध्ये विरोधात लढणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच उर्वरित महापालिकांमध्येही महायुतीवर चर्चा झाल्याचे कळते.