राज्यसभेत भाजपाची ताकद वाढली
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी राजकीय भूकंप झाला. ‘आप’ने राज्यसभेच्या उप गटनेते पदावरून हटवलेल्या खासदार राघव चड्डा यांच्या नेतृत्वात तब्बल सात खासदारांचा गट फुटला. सात खासदारांचा गट भाजपामध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे.
राघव चड्ढा, राजिंदर गुप्ता, अशोककुमार मित्तल, संदीप पाठक, विक्रमजीत सिंग सहानी, हरभजन सिंग, संत बलबीर सिंग अशी या खासदारांची नावे आहेत.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं ऑपरेशन लोटस हे खालच्या दर्जाचं राजकारण असून पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारला रोखण्याचं काम सुरु केलं आहे. पंजाबची जनता भाजपमध्ये जाणाऱ्या खासदारांना माफ करणार नाही, असे आपचे खासदार संजय सिंह म्हणाले.
भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या आता ११३ वर पोहोचली आहे. राज्यसभेत सर्वाधिक खासदार असलेला दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसचे २९ खासदार आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष अशून, त्यांचे १३ खासदार आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आम आदमी पार्टी होती. पण, त्यांचे सात खासदार फुटल्याने आता फक्त तीन खासदारच असणार आहेत. डीएमकेचे राज्यसभेत आठ खासदार आहेत. त्यापाठोपाठ सात खासदार राष्ट्रपती नियुक्त आहेत. वायएसआर काँग्रेसचे सात खासदार आहेत. बीजू जनता दलाचे सहा, अण्णाद्रमुकचे पाच खासदार, नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)चे चार खासदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) चार खासदार, समाजवादी पक्षाचे चार खासदार आहेत. त्यानंतर भारत राष्ट्र समिती, सीपीआय (एम), अपक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल यांचे प्रत्येकी तीन खासदार आहेत. त्यानंतर सीपीआय, आययूएमएल, झारखंड मुक्ती मोर्चा, शिंदेसेना, तेलगू देसम, यूनायटेड पीपल्स पार्टी यांचे प्रत्येकी दोन खासदार आहेत.
गोवा आसाम गण परिषद, बसपा, डीएमडीके, जनता दल (धर्मनिरपेक्ष), केरळा काँग्रेस (एम), एमएनएम,मिझो नॅशनल फ्रंट, नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), पीएमके, आरएलडी,आरएलएम,आरपीआय आठवले, उद्धवसेना यांचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत आहेत.