ठाणे जिल्ह्यात ४९ हजार मूर्तींचे विसर्जन
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३४ हजार गणेशमूर्ती तर, १५ हजार गौरी मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. यात १७३ सार्वजनिक गणेश मूर्ती तर ३४,२९४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता.
यंदा गौरी आगमनाची तारीख उशिरा आल्यामुळे सात दिवसांच्या गणरायाबरोबरच गौरींचे विसर्जन झाले. विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, तलाव आणि खाडीकिनारी उत्साहाचे वातावरण होते. गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी गौरी गणपतीला निरोप दिला. साधारणपणे गौरींचे आगमन गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होते आणि दोन दिवसांच्या पूजनानंतर त्या निरोप घेतात. मात्र, यंदा पंचांगानुसार गौरी आगमनाची तारीख उशिरा आली. यावर्षी गौरींचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा सात दिवसांच्या गणपतीसोबतच गौरीपूजनाचे दिवस आले आहेत. म्हणून सात दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन मंगळवारीच पार पडले.
ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरात आज तब्बल ३४,४६७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचसोबत १५,३२७ गौरीमूर्तींनाही निरोप देण्यात आला. पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत. तसेच ढोलताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत, पारंपारिक वेशभूषेत भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी मिरवणुका काढल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिमंडळानुसार विसर्जन आकडेवारी
परिमंडळ – सार्वजनिक – खासगी – गौरी
१) ठाणे – २२ – ५४०० – १७८२
२) भिवंडी – ३० – ७०१३ – ८८८
३) कल्याण – ५६ – ८५१८ – ६५०२
४)उल्हासनगर – ३१ – ५०२५ – ४४८५
५) वागळे इस्टेट – ३४ – ८३३८ – १६७०