डोंबिवली: पश्चिमेकडील अनमोल नगरीजवळील साईनगर परिसरात अनेक महिन्यांपासून पाण्याची बिकट समस्या होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी या समस्येवर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
भाजपा कार्यकर्ते संदीप म्हात्रे व साईनाथ मढवी यांनी त्याच्या मालकीच्या जागेतून नवीन जलवाहिनी जाऊ देण्यास मंजुरी दिली. परिणामी येथील एक हजार कुटुंबियांचा पाणीप्रश्न सुटला.
रविवारी उपमहापौर राहुल दामले यांनी या ठिकाणी येऊन श्रीफळ वाढविल्यानंतर जलवाहिनी सुरु करण्यात आली. यामुळे अनेक महिन्यांपासून असलेल्या टँकर समस्येतून येथील कुटुंबीयांची मुक्तता झाली. त्याचप्रमाणे येथील रस्त्यावर भाजपाच्या प्रयत्नाने पथदिवे लावण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, ऍड. सौरभ ताम्हणकर, भाजपा कार्यकर्ते संदीप म्हात्रे, रोहिदास मढवी यांसह साईनगरमधील रहिवासी उपस्थित होते.
आपल्या मालकी जागेवरून जलवाहिनी टाकण्यास मंजुरी दिल्याबद्दल संदीप म्हात्रे व मढवी यांचे उपमहापौर दामले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील रहिवाशांनी माजी नगरसेवक भोईर व माजी नगरसेविका भोईर यांचे आभार मानले. दरम्यान माजी नगरसेवक प्रकाश भोईर म्हणाले, येथील एक हजार नागरिकांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.