बारावी परीक्षार्थींच्या मदतीला धावले ‘रायडर्स’!

ठाणे वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर दोन दिवसांत २६ कॉल्स

ठाणे: बारावीच्या परीक्षा कालावधीत वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणीत सापडलेल्या परिक्षार्थीकरीता ‘रायडर्स’ धावले आहेत. या दोन दिवसांत परिक्षेसाठी जाताना विलंब झालेल्या २६ विद्यार्थ्यांनी वाहतूक शाखेच्या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधला. हेल्पलाईनवर कॉल येताच संबंधित परिसरातील वाहतूक पोलीस (रायडर्स) तत्काळ मदतीसाठी रवाना होऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार, विविध रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केले असून 7039003866 या ट्राफिक कंट्रोल व्हॉटसॲप क्रमांक व 8286300300 व 8286400400 या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईनसह १८ वाहतुक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या उपक्रमाला बारावी परिक्षार्थी व त्यांच्या पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मंगळवार १० फेब्रुवारी रोजी वाहतूक नियंत्रण कक्षात २५ कॉल तर, बुधवार ११ फेब्रुवारी रोजी एकाच विद्यार्थ्याचा कॉल प्राप्त झाला. हेल्पलाईनवर संपर्क साधताच संबंधित परिसरातील वाहतूक पोलीस (रायडर्स) तत्काळ मदतीसाठी रवाना होत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी सिग्नल क्लिअर करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक ठिकाणी वाहन एस्कॉर्ट देण्याची जबाबदारी पार पाडुन विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याकामी साहाय्य केले.

ठाणे वाहतूक शाखेच्या या संवेदनशील व विद्यार्थीहिताच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला असून पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.