उल्हासनगर: निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ६ अंतर्गत दाखल झालेल्या उमेदवारांपैकी एकूण १८९ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात ४३२ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
उल्हासनगर महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक अपक्ष तसेच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार अथवा राजकीय दबावामुळे माघार झाल्याची चर्चा सुरू आहे.
याआधी झालेल्या छाननी प्रक्रियेत २८ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज आरओ क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या पॅनल क्रमांक १, २ व ३ मधून एकूण २४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. पॅनल क्रमांक १ मधील शिवसेना (उबाठा)चे उमेदवार मंगल वाघे यांच्या पत्नीने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आरओ क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या पॅनल क्रमांक १०, ११ व १२ मधून एकूण ३६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पॅनल क्रमांक १० (अ) मधील दीपा साळवे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पॅनल क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाच्या चारही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.