राज ठाकरे यांचा सावधगिरीचा इशारा
ठाणे: मुंबई आणि ठाण्याच्या मराठी ओळखीवर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. मला सत्तेचा हव्यास नाही, शहर डोळ्यासमोरून जाऊ नये हीच इच्छा आहे. ठाणे विकासाच्या नावाखाली विकले जाऊ नये. आधी स्वाभिमान टिकवा, मराठी ठसा जपा आणि शहर वाचवा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भूमिका स्पष्ट केली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मनसे आणि ठाकरे गटाच्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला.
राज ठाकरे म्हणाले, ठाणे हे केवळ महानगरपालिका किंवा निवडणुकीपुरते शहर नाही, तर मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर आहे. आज या ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे कारस्थान सुरू असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. शहराचा विकास महत्त्वाचा आहेच, पण त्याआधी ठाण्याचा स्वाभिमान आणि मराठी ठसा टिकवणे हेच खरे उद्दिष्ट असले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कल्याण-डोंबिवली परिसरात पैशांच्या जोरावर उमेदवारी मागे घ्यायला लावली जात असल्याची टीका करत त्यांनी तिथे गुलामांचा बाजार मांडला असल्याचेही ते म्हणाले. तुम्हीसुद्धा पाच-पाच हजारांना विकले जात आहात, उद्या तुमच्या मुलांना तुम्ही काय सांगणार आहात याचा विचार करा, असा परखड सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितांना केला.
राज ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. सोलापूर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा खून होतो, पोलीस हतबल दिसतात. हे कोणते राज्य आहे?” असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप केला. कोर्ट, पोलीस यांच्याकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विमानतळ, बंदरे, वीज यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर मक्तेदारी निर्माण होत असून, भविष्यात देश आणि राज्याचे भवितव्य काही मोजक्या लोकांच्या हातात जाण्याचा धोका आहे. माझ्या घरी अदानी, रतन टाटा, मुकेश अंबानी येऊन गेले आणि म्हणून यांची पापं झाकायची का? असा सवाल त्यांनी केला. मात्र भविष्यात येणारे संकट माहीत आहे, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा-जेव्हा संकट येईल तेव्हा राज ठाकरे गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.