जुन्या ठाण्यात दाटीवाटीने होत आहे इमारतींचा पुनर्विकास

आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाच्या वाहनांची होणार कोंडी

ठाणे: जुन्या ठाण्यातील दाटीवाटीने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या सात-आठ मजल्याच्या इमारतींची पाहणी न करताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचे उघडकीस येत आहे. भविष्यात येथे आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची वाहने देखील इमारतीजवळ जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती माजी स्थायी समिती सभापती भास्कर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

चरई, बाजारपेठ, के व्हिला, खारकर आळी, नौपाडा, भास्कर कॉलनी, स्टेशन रोड, चेंदणी आदी भागात जुन्या इमारतींची पुनर्बांधणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या इमारती सात ते आठ मजल्याच्या असून दाटीवाटीने उभ्या राहत आहेत. त्यांचे आराखडे मंजूर करताना अग्निशमन दलाची गाडी चारही बाजूने जाऊ शकते कि नाही याची पाहणी करणे आवश्यक आहे. नियमानुसार अंतर ठेवले कि नाही याची पाहणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक असतानाही ते पाहणी करत नाहीत, अशी लेखी तक्रार श्री. पाटील यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

त्यांनी तक्रारीमध्ये असेही नमूद केले कि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आल्याशिवाय शहर विकास विभाग आराखडा मंजूर करत नसल्याचे उत्तर श्री.पाटील यांना दिले असून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रांची चौकशी करुन पाहणी न करताच दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी श्री.पाटील यांनी केली आहे.