रेल्वे रूळ ओलांडू नका
अंबरनाथ : रेल्वेमार्ग ओलांडून अपघात होण्याचे प्रमाण वाढत असून अशा अपघातांना आळा बसावा यासाठी रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळालगत मानवी साखळी उभी करून रुळ ओलांडून जाणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन रुळ ओलांडून जाऊ नये, असे सांगून अनोख्या रीतीने जनजागृती केली.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या मोरीवली गाव परिसरात पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी नागरिक लोहमार्ग ओलांडून जीव धोक्यात टाकून जातात. रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत या परिसरात अंदाजे 40 जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. हे अपघात थांबवण्यासाठी जीआरपी आणि मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून आज मानवी साखळी तयार करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. असे अपघात थांबवण्यासाठी रेल्वे कडून‘झिरो डेथ’ संकल्पना राबवण्यात येत आहे.

रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असून नागरिकांनी सुरक्षित मार्गाचा वापर करावा, यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मोरीवली गाव परिसरात बुधवार 17 जून रोजी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी मानवी साखळी तयार करून नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडू नका, असे आवाहन केले. रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून गुलाबाचे फूल देण्यात आले आणि जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये, असे विविध संदेश असलेले फलक घेऊन याठिकाणी पोलिसांनी मानवी साखळी करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्ये रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी केले. यावेळी कल्याण विभाग लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, यांच्यासह सात पोलीस अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार तसेच आर पी एफचे तीन अधिकारी 10 आरक्षक, महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घरत व सदस्य, स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.