डोंबिवलीत ११५ रिक्षाचालकांवर दंडात्मक बडगा

डोंबिवली : प्रवाशांकडून भाडे नाकारणे, मनमानी करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधातील आंदोलनाची दखल घेत वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागांत तपासणी सुरू केली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत सुमारे ११५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांना ई-चलानद्वारे दंड लावण्यात आला. पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडून भाडे नाकारणाऱ्या आणि केवळ ठराविक मार्गावरील प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच शहरातील मुख्य रस्ते, गर्दीची रस्ते आणि चौकांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. रिक्षा चालकांची तसेच रिक्षा कागदपत्रे, परवाने याची होत आहे. यामध्ये काही चालक काम करताना नियमाविरुद्ध दिसून आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.
शहरात प्रवासी वाहतूक करताना रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्याचे प्रकारही सर्रास होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत काही रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त प्रवासी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून ओव्हर सीट आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाच्या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेऊ नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. अलीकडील तपासणी मोहिमेत ८० हून अधिक रिक्षा व इतर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.