मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्याप्रकरणी मुंब्र्यात आंदोलन

ठाणे: मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानिषेधार्थ मुंब्रा येथे ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानिषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारूल फलाह मशिद येथे हे आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्टय़ा अद्याप मागास आहे. तसेच, शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व मिळत नाही. ते मिळावे, यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

या प्रसंगी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, हातात, मुस्लीम आरक्षण मिळालेच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय, असे संदेश दिलेले फलक घेतले होते.