बाळकुममध्ये पोलिसांनी रोखला बालविवाह

नवरदेवासह भाऊ ताब्यात

ठाणे: बालविवाह हे ग्रामीण आणि आदिवासी भागातच होतात, हा समज ठाणे शहराने खोटा ठरवला आहे. एका चौदा वर्षाच्या मुलीचा ३४ वर्षाच्या पुरुषाशी बाळकुममध्ये होणारा विवाह आज कापूरबावडी पोलिसांनी रोखत नवरदेवासह त्याच्या भावास ताब्यात घेतले.

बाळकुम दादलानी न्यू महालक्ष्मी नगर परिसरात एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह एका ३४ वर्षाच्या राजस्थानी पुरुषाशी होत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रशांत मोटे यांना मिळताच त्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत घटनेची शहानिशा केली. मिळालेली माहिती सत्य असल्याचे आढळून आल्यानंतर कापूरबावडी पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनावणे यांना संपूर्ण माहिती दिली.

माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रशासन डॉ. संजय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कोल्हापुरे, पोलिस उपनिरीक्षक अशोक शेळके, पोलिस काँस्टेबल राहुल भोसले, पोलिस हवालदार सीताराम बुधर, महिला पोलिस हवालदार उषा कोळी यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत पुरुष नवरदेव, त्याचा भाऊ आणि १४ वर्षीय नवरी मुलगी यांना ताब्यात घेतले. कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल केले असता बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.