अंबरनाथला बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धाड

पाच जणांना अटक

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये व्यावसायिक संकुलात सुरु असलेल्या एका कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

कल्याण-बदलापूर राज्य मार्गावरील एका व्यावसायिक संकुलातील कॉल सेंटरमध्ये प्रकार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पश्चिम भागातील ग्लोब या व्यावसायिक संकुलात रुद्रा टेक आयटी या कंपनीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकत पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, संगणक जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीतून कर्मचारी अमेरिकेतील ग्राहकांना मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करून सॉफ्टवेअर विक्री केली जात होती. सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षीत केले जात होते. तसेच सॉफ्टवेअर खरेदीच्या नावाखाली ग्राहकांचा विश्वास मिळवला जात होता. त्यानंतर ग्राहकाला काही पैसे आगाऊ देण्यासाठी मागणी केली जात होती. सॉफ्टवेअर खरेदीसाठी ग्राहकाला पैसे देण्यासाठी पर्याय दिले जात होते. ग्राहकाने पैसे भरताच त्याला ब्लॉक केले जात होते, अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.

याप्रकरणी रुद्रा टेक आयटी या सेंटरचे मालक कमलेश सचवानी याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दररोज १०० ते २०० जणांना फोन करण्याचे उद्दिष्ट दिले जात होते. त्यातून खरेदीसाठी तयार होणाऱ्या ग्राहकाला लुबाडले जात होते. त्यांच्या फसवणुकीची रक्कम किती ते लवकरच स्पष्ट होईल, असेही पोलिस निरीक्षक सय्यद यांनी सांगितले आहे. यात सध्या तरी पाच जण सक्रीय असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी या पाचही जणांना अंबरनाथ येथील चिखलोली न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत आहेत.