मोदी-मुखवटा, मानसिकता आणि ठाणे

मतदारांची मानसिकता निर्णायक ठरू शकते हे प्रत्येक निवडणुकीत जेव्हा काही धक्कादायक निकाल लागतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते. तोपर्यंत उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराची व्यूहरचना आखण्यापर्यंत मतदारांना गृहीत धरले जात असते हा सर्वसामान्य अनुभव आहे. त्यात या खेपेस बदल होईल ही मतदारांची आंतरिक अपेक्षा असली तरी जुन्याच गृहीतकांना आणि निकषांना सरावलेले पक्षीय नेतृत्व त्यात काही बदल करतील असे वाटत नाही. त्यांना धक्कादायक काही घडेल असे वाटत नसावे किंवा जे सत्ताधारी गटबंधनात आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय तारेल असा आत्मविश्वास आहे. या दोन्ही बाबी अर्थातच मतदारांच्या मानसिकतेवर अवलंबून असतात आणि उमेदवार भले पक्षाचा असला तरी त्याची व्यक्तिगत प्रतिमा, कार्य, जनसंपर्क, चारित्र्य आणि राजकारणात राहून समाजकारणाची जाणीव किती आहे हे तितकेच महत्त्वाचे ठरते.
आपण संपूर्ण देशाचा या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती, पूर्वानुभव आणि भविष्यातील आकांक्षा यांचा तेथील जनतेच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो हे नाकारता येणार नाही. मोदी म्हणत असले चारशे पार तरी आपण आपल्या मतदारसंघात वेगळा विचार करायला हरकत नाही, असा विचार करणारे असतीलच की. त्यांचा मोदींना विरोध नसेलही पण स्थानिक उमेदवार पटत नसला तर? ही जोखीम घेणारी मतदारांची मानसिकता व्यापक झाली तर चारशेचे लक्ष आव्हानात्मक ठरू शकते.
तूर्तास आपण ठाणे जिल्ह्याचा विचार करूया. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे तेथील मतदार कसे पाहतात हे तपासावे लागेल. राज्यातील राजकीय उलथापालथीचा परिणाम सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात झाला आहे. हे मान्य करावे लागेल. नव्या आघाड्या, नवी समीकरणे, नवे पेच, नवे समझोते, भरीस भर आरक्षणासारखा मतांचे ध्रुवीकरण करणारा मुद्दा, असे सर्व विषय महाराष्ट्रातील प्रचारावर आणि पुढे जाऊन मतदानावर प्रभाव टाकू शकतात. शिवसेना फुटल्यानंतर ठाणे हा राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य आणि त्यांची जडणघडण याच जिल्ह्यात झाली. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असा लौकिक प्राप्त करणाऱ्या या जिल्ह्यात बालेकिल्ल्यातील नेमकी किती जागा कोणत्या शिवसेनेने व्यापली आहे हा प्रश्न असेल. राजन विचारे निवडून आले तेव्हा हाच प्रश्न भाजपाने उपस्थित केला होता. खासदार विचारे यांच्या यशात भाजपाचा टक्का अधिक आहे असा दावाही ते करीत होते. आता दोन शिवसेनांमध्ये त्यांचा टक्का विभागला जाईल आणि भाजपाची कधी नव्हती तेवढी गरज एकनाथ शिंदे यांच्या सेनेला लागेल. हा अन्वयार्थ भले शिंदे गट काढणार नाही. अन्यथा त्यानंतर भाजपाच्या या जागेवरील दाव्याकडे सहानुभूतीने पाहिले असते. तसे होताना दिसत नाही. भाजपाला ठाणे जिल्ह्यातील दोन्ही जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. ही बाब पक्षाच्या हक्काच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना किती रुचेल हे सांगता येणार नाही. त्यासाठी आधी म्हटले त्याप्रमाणे
शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपाच्या संस्कृती आणि संस्काराची गरज लागणार. उमेदवार सेनेचा असला तरी त्याच्या चेहऱ्यावर मोदींचा मुखवटा चढवावाच लागणार.
मुखवटा चढवताना सेना उमेदवाराला पुन्हा एकदा भाजपा मतदारांच्या मानसिकतेचा विचार करावा लागणार. ठाणे असो की कल्याण, या दोन्ही महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण सुरू आहे. मराठी मतदारांचे प्राबल्य असले तरी अमराठी टक्का निवडणुकीच्या गणितावर परिणाम साधू शकतो हे नाकारता येणार नाही. भाजपाच्या मतदारांना अपेक्षित उमेदवार सेनेने द्यावा ही येथील मानसिकता असेल तर त्याचा विचार पक्षाला करावा लागेल. प्रसंगी काही नवीन प्रयोग (नवीन चेहरा) करण्याचा विचारही अनुकूल परिणाम साधू शकेल. विचारे हे हॅट-ट्रिकसाठी प्रयत्न करणार. त्यासाठी ते जोरही लावतील परंतु जो सर्व प्रचलित उमेदवारांना त्रास असतो तो अँटी ‘इन्कम्बन्सी’चा त्रास त्यांना असू शकतो. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला येणाऱ्या सहानुभूतीचा लाभ या भानगडीत पुसला जाणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागेल.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणताही असो, तो मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचा असणार यात वाद नाही. परंतु त्याला निवडून आणण्यासाठी कोणाच्या चेहऱ्यावर मोदींचा मुखवटा ‘फिट’ बसतो आणि मतदारांच्या मानसिकतेला साजेसा ठरतो, हे पाहावे लागेल.