१०० वर्षांनी सातबाऱ्यावर पोलीस ठाण्याचे नाव
शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे १०० वर्षानंतर अखेर पोलिस ठाण्याच्या नावावर जमिन झाली आहे.
किन्हवली पोलीस ठाणे हे ब्रिटीश काळापासून आहे. या ठिकाणी एका चाळीसारख्या घरात पोलिस ठाण्याचा कारभार सुरू असतो. या पोलिस ठाण्याची हद्द फार मोठी आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी असली तरी पोलिस अधिकारी-कर्मचारी जनतेची सेवा करत आहेत. पावसाळ्यात या पोलीस ठाण्यात गळती सुरू होते, त्यामुळे प्रत्येकवर्षी ताडपत्रीचा सहारा घ्यावा लागतो. या पोलिस ठाण्याचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव २०१२ साली राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर यावर्षी राज्य सरकारने मंजुरी दिली, परंतु पोलिस ठाण्याची जागा ही राज्य सरकारच्या नावावर नसल्याने पुनर्विकास करण्यात अडथळा येत होता.
अखेर यावर्षी २०२३ साली राज्य सरकारच्या नावावर असलेली ३८ गुंठे जमिन किन्हवली पोलिस ठाण्याच्या नावावर करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे, त्यामुळे या पोलिस ठाण्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याकरिता तीन कोटींचा निधी पोलिस गृहनिर्माण विभागामार्फत मिळण्याची शक्यता असून या वर्षी त्याचे काम सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे प्रमुख कमलेश बच्छाव यांनी देखिल जमीन मोजणी करण्यासाठी मेहनत घेतली. या ठिकाणी सुसज्ज पोलिस ठाणे आणि पोलिस कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी वसाहत बांधली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्री. देशमाने यांनी सांगितले.