खानपान सेवेचे बिल थकले; ठेकेदारांची दीड वर्षे ससेहोलपट

* जिल्हाधिकारी-निवडणूक आयोगाची टाळाटाळ
* लेखाशीर्ष बुडित होण्याची भीती

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत खानपान सेवा देण्यासाठी अनेक कंत्राटदारांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आली होती. मात्र दीड वर्षांनंतरही या कंत्राटदारांना त्यांची बिले अदा करण्यात आलेली नसून निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकमेकांकडे चेंडू टोलवत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांसह त्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत ही बिले अदा करण्यात आली नाहीत तर संबंधित लेखाशीर्ष बुडीत जाण्याची भीती कंत्राटदार व्यक्त करत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या कामकाजासाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाकरीता खानपान सेवा देण्याची निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत आठ कॅटरर्सनी सहभाग घेतला होता. हे काम जिल्ह्यासाठी आठ कॅटरर्सना विभागून देण्यात आले होते, अशी माहिती या कॅटरर्सपैकी श्री.राजवाडे यांनी दिली.

या कॅटरर्सना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खानपान सेवेचे काम देण्यात आले होते. या सेवेसाठी आठ कॅटरर्सचे जवळपास आठ कोटी रुपयांचे बिल आहे. बिलाची रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही गेली दीड वर्षे बिलाची रक्कम दिली जात नाही. बिलाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयास निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ती दिली जात नसल्याची सांगण्यात येत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम दिलेले असल्याने बिल देण्याची प्राथमिक जबाबदारी त्यांचीच असल्याचे श्री.राजवाडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित कॅटरर्सनी खानपान सेवा पुरविण्यासाठी ज्यांच्याकडून माल घेतला होता, त्यांचे पैसे चुकविण्यासाठी कर्ज घेतले. त्या कर्जाचे व्याज चुकवताना नाकीनऊ येत आहे. बिल मिळत नसल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आली असल्याचे राजवाडे यांनी सांगितले.

खानपान सेवेचे बिल अदा करण्यासाठी पुरेसे पैसे असताना ते देण्यास टाळाटाळ केली जात असून ३१ मार्चपर्यंत बिलाचे पैसे मिळाले नाहीत तर त्यासाठी ठेवण्यात आलेले लेखाशीर्ष बुडित होऊ शकते, अशी भीती काही ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.