ठाणे: भातसा धारण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. परिणामी पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा जवळपास ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबई महापालिकेने देखील यापूर्वीच १० टक्के पाणी कपात लागू केली असून ठाणेकरांना केवळ ५० टक्केच पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.
शहापूर, भिवंडी या तालुक्यांना पावसानाने अक्षरशः झोडपून काढले असून शहापूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. शहापूरमधील भातसा धरण क्षेत्रात ठाणे महापालिकेचे पिसे पम्पिंग स्टेशन असून शहाड येथे स्टेम प्राधिकरणाचे पम्पिंग स्टेशन आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. याच पम्पिंग स्टेशनमधून संपूर्ण ठाणे शहराला पाणी पुरवठा होत असून नदी पात्रात गाळ अडकल्याने पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे.
दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस ९,१० आणि ११ जुलै रोजी अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. हा अनियमित पाणी पुरवठा ४० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याने ठाणेकरांना पुढचे तीन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महापालिकेने देखील पाणी जपून वापरण्याचे आवाहन संपूर्ण ठाणेकरांना केले आहे.