कसारा: शहापूर तालुक्यातील अजनूप-दापुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत 17 घरे आणि 100 लोकवस्तीचा सावरखुट हा आदिवासी पाडा सोयीसुविधांअभावी पिण्याच्या पाण्यासाठी मरणयातना भोगत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यवैतरणा धरणाच्या लगत सावरखुट पाडा वसलेला आहे. डोळ्यासमोर धो धो पाणी वाहून जात असताना या आदिवासींना पाणी प्यायला मिळत नाही. रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दोन किमीचा डोंगर तुडवत येथील स्रिया, लहान मुले तसेच पुरुषांना नदीच्या पात्रातून पाणी आणावे लागत आहे, परंतु याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष आहे.
पाणी आणायला दोन तास लागतात, पाणी घरी घेऊन जाताना अक्षरशः आत्महत्या करावीशी वाटते, अशी प्रतिक्रिया वृद्ध महिला यशोदा वारे यांनी दिली. ठक्करबाप्पा योजनेच्या माध्यमातून तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून सावरखूट पाड्याचा पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु चारही बाजूने वनविभागाची जमीन असल्याने अडचणी येत आहेत. तरी देखील आम्ही या पाड्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती आमदार दौलत दरोडा यांनी दिली.