बेरोजगार तरूण-नवउद्योजकांची कर्ज देण्याची मागणी
ठाणे: एकीकडे एलआयसीवर दबाव आणून अदानी समूहाला ३३ हजार कोटी एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही कर्ज दिले जात नाही, असा आरोप करत तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे, या मागणीसाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एलआयसी कार्यालयावर धडक दिली.
अदानी समूहावरील कर्जाचे ओझे वाढले आहे. त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एलआयसीवर दबाव आणून अदानी समुहात सुमारे 33 हजार कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्व सामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध आहे, असे म्हणत राष्ट्रवादी (श.प.) ने हे आंदोलन केले, अशी माहिती शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देत तसेच फलक झळकावत एलआयसी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच विभागिय व्यवस्थापक रूपा भंडारे यांची भेट घेऊन, जर अदानीसारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे; आम्हाला व्यवसाय करायचा आहे, अशा आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या.
या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन, युवाध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भोईर, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.