गांधी उद्यानाजवळ फूड हब उभारण्याच्या हालचाली सुरू

मासुंदा होणार फेरीवालामुक्त

ठाणे: ठाणे शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला लागलेले फेरीवाल्यांचे ग्रहण अखेर सुटणार असून जवळील गांधी उद्यानालगत फूड हब उभारून फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली ठामपाने सुरू केल्या आहेत.

ठाणे शहराची चौपाटी, मनोरंजनाचे हक्काचे स्थळ म्हणून मासुंदा तलावाकडे पाहिले जाते. शहराबाहेरील नागरीकही येथे पर्यटनासाठी येतात. म्हणूनच गेल्या वर्षी मासुंदा तलावाचा कायापालट करत परिसर आणखी सुशोभित करण्यात आला आहे. मात्र सुशोभनानंतरही फेरीवाल्यांमुळे तलावाला बकालपणा आला होता. त्याच दरम्यान पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या पहाणी दौर्‍यात ही बाब निदर्शनास आली. या फेरीवाल्यांना हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र पर्यटकांची गैरसोय लक्षात घेत फेरीवाल्यांसाठी खाऊ गल्ली तयार करून देण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर आता जवळपास एक वर्षाने या आदेशाची कार्यवाही होत आहे.

मासुंदा तलावाजवळ असलेल्या गांधी उद्यानाशेजारील मैदान विकसित करून तेथे फूड हब उभारण्यात येणार आहे. पाणी, विद्युत दिवे आणि इतर सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत. या फूड हबमध्ये पाणीपुरी, पावभाजी, आईस्क्रीम असे विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत.

तलावपाळी परिसरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणार्‍या खाद्यविक्रेत्यांना या हबमध्ये प्रथम प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर असलेली कारवाईची सततची टांगती तलवार दूर होणार आहे. पर्यटकांनाही विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटता येणार आहे.

फूड हब तयार करण्याची जबाबदारी पालिका ठेकेदारावर सोपवणार आहे. त्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रसिद्ध केली असून त्यानेच मैदानाचा विकास करून फेरीवाल्यांसाठी फूड हब उभारायचे आहे.