नॉन एसी प्रवाशांनाही आधुनिक सुविधा देणार!

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे आता नॉन-एसी प्रवाशांसाठी चांगल्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या आधुनिक आणि सुरक्षित ‘अमृत भारत ट्रेन्स’चा वेगाने प्रचार करत आहे. या ट्रेन्स केवळ किफायतशीर नसतील तर आता जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय रेल्वेने सामान्य जनता आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना लक्षात घेऊन नॉन-एसी रेल्वे प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. परवडणाऱ्या भाड्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील प्रवाशांना प्रवास सुलभ ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. नॉन-एसी प्रवासाचा अनुभव अमृत भारत ट्रेन्सच्या स्वरूपात पूर्णपणे बदलला जात आहे. या ट्रेन्समध्ये आधुनिक सुविधा आणि उच्च सुरक्षा मानकांसह अपंगांसाठी अनुकूल कोच समाविष्ट आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वे पुढील पाच वर्षांत 17 हजार नवीन नॉन-एसी कोच सुरु करणार आहे. ज्यामुळे जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील. मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील 22 कोचपैकी 12 कोच जनरल/स्लीपर नॉन-एसी असतील आणि आठ कोच एसी असतील. याशिवाय, अनारक्षित प्रवाशांना मेमू/ईएमयू गाड्यांमधून प्रवास करण्याचा परवडणारा पर्याय देखील मिळत आहे. रेल्वे मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की रेल्वे भाडे निश्चित करताना सेवेचा खर्च, किंमत, सामाजिक-आर्थिक स्थिती, स्पर्धा आणि प्रवाशांची देय क्षमता या पैलूंचा विचार केला जातो.

रेल्वेमंत्र्यांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 सामान्य कोच जोडले. यावरून हे स्पष्ट होते की रेल्वे जनरल आणि स्लीपर क्लास प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी सतत संसाधने वाढवत आहे.