ठाण्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दूजाभाव?

अर्ज बाद झालेल्या उमेदवारांचा आरोप

ठाणे: निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी वागळे येथिल तीन प्रभागांमधील मनसे आणि अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे येथिल वातावरण तापले आहे.

वागळे प्रभाग समितीमधील प्रभाग क्र. १६, १७ आणि १८मधील मनसे उमेदवार घाडगे यांच्यासह माजी नगरसेविका आणि चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. बाद करण्यात आलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जामध्ये काही रकाने रिकामे ठेवल्याचे कारण देऊन त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. परंतु शिवसेनेच्या एका महिला उमेदवाराचे रकाने रिकामे असतानाही तिचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला असल्याचा आरोप अर्ज बाद करण्यात आलेल्या उमेदवारांनी केला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना एक न्याय आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांना वेगळा न्याय देण्याचे काम निवडणूक निर्णायक अधिकारी करत असून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पायघड्या आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांबरोबर नीट बोलत देखील नाहीत. त्यांना मुद्दाम थांबवून ठेऊन त्याना वेळ न देता त्यांचे अर्ज बाद केल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे.