मुंबई महापालिकेत महायुतीला काठावर यश मिळाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जागा जिंकूनही भाजपला आपला महापौर बनवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची मदत लागणार आहे. दरम्यान शिंदे गटाने आपले नगरसेवक नजरकैदेत ठेवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा दबाव काढून टाकण्यासाठी आता ठाण्यातील भाजप कामाला लागली आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे ७५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहूमतासाठी लागणारे ६६च्या संख्याबळापेक्षा नऊ नगरसेवक जास्तीचे शिंदे गटाकडे आहेत. अशावेळी आपल्या पदरात काय पडणार ही चिंता भाजपला सतावू लागली आहे.
मुंबईत खलबते सुरू असल्याने आणि जिल्ह्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपला दुय्यम स्थान मिळत असल्याचे पाहत ठाण्यात भाजपने आता थेट दोन वर्षे महापौर पदाची मागणी केली आहे. भाजपचा शहरात ७४ टक्के रेट असून महायुतीत कमी जागा घेऊनही जास्तीचे नगरसेवक निवडून आणल्याकडे लक्ष वेधले आहे. दोन वर्षांसाठी महापौर पद द्या अन्यथा विरोधी बाकावर बसण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता असली तरी त्यांनी सावध भुमिका घेतली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली असून सत्तेत दोन्ही पक्ष असावेत असे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र याविषयी अंतीम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही ते म्हणाले आहे.