ठाणे: मतदानाला कमी दिवस उरले असून प्रचारासाठी फक्त दोन रविवार मिळणार आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचार रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर दिला असून प्रचारात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर अपक्ष उमेदवारांना चिन्ह उशिरा मिळाल्याने त्यांनी प्रचाराचा शुभारंभ अजूनही केला नाही.
महायुतीचे उमेदवार सुधीर कोकाटे, पवन कदम, नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी प्रचार रॅली काढली होती. आ. संजय केळकर हे त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर प्रभाग क्र. ४ आणि ५ येथे भाजपा उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आशिष शेलार आले होते. त्यांनी या भागातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. वागळे भागातील प्रभाग क्र १६ मधील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रभागातील आणि प्रभाग क्र. १९, १८ आणि १७मधील मतदारांच्या गाठीभेटी माजी आमदार रविंद्र फाटक आणि या भागातील महायुतीच्या उमेदवारांनी घेतल्या. कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर या भागातील उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्यावर भर दिला. काही भागात चौक सभांचे देखील आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांचे समर्थक हातात पक्षाचे झेंडे, निशाणी घेऊन उमेदवारांना मतदान करण्याच्या घोषणा देत गल्लोगल्ली फ़िरताना दिसत होते. मतदारांचे चरण स्पर्श करताना अनेक उमेदवार दिवभर फिरले. दुपारी काही काळ विश्रांतीनंतर अनेक उमेदवार राहिलेल्या भागात प्रचार रॅली काढताना दिसत होते.