पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात?
नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून तुर्भे स्टोर परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून पाण्यातून चक्क जंतू, किडे येत आहेत. हे पाणी प्यायल्याने काही नागरीकांना जुलाबाचा त्रास होऊ लागला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेला ख्याती प्राप्त आहे. मात्र याच शहरात राहत असलेल्या नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तुर्भे स्टोर परिसरात चार-पाच दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असताना आता चक्क नळातून किडे आणि जंतू बाहेर पडू लागले आहेत. तुर्भेमध्ये जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या तसेच गटाराचे योग्य नियोजन नाही. उघड्या गटारालगत असलेल्या जलवाहिनीला गळती असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी प्यायल्याने नागरिकांना जुलाबाचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवी मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा विभागामार्फत योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तुर्भे स्टोर परिसरात येणाऱ्या गढूळ पाण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाकीचा उपसा करण्यात येत आहे. या भागात काही जलवाहिन्या गटार आणि ड्रेनेज लाईन जवळ असल्याने त्या फुटून गढूळ पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व जलवाहिन्यांची तपासणी करून त्या बदलल्या जातील, असे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता नितीन तारमळे यांनी सांगितले.