माजिवडा-पडघा मेट्रोने जोडल्यास लाखो प्रवाशांना फायदा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कपिल पाटील यांचे निवेदन

भिवंडी: ठाणे शहरातील माजिवडा नाक्याहून भिवंडी तालुक्यातील पडघा गावापर्यंत नवीन मेट्रो प्रकल्पाला मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन कपिल पाटील यांनी निवेदन दिले. तसेच कापूरबावडी (ठाणे) ते भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाप्रमाणेच भिवंडी तालुक्याच्या विकासासाठी माजिवडा ते पडघा गावापर्यंत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली. यापूर्वी कपिल पाटील यांनी २०१७ मध्ये ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे – भिवंडी बायपास हा नव्याने विकसित होणारा भाग आहे. त्यात माजिवडा ते पडघा हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे. जेएनपीटीहून गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या जड-अवजड ट्रकची वाहतूक या रस्त्यावरूनच होत असते. ठाण्याहून माणकोली पुलामार्गे डोंबिवलीपर्यंत जाणारी वाहने ही या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. तर मुंबईहून समृद्धी महामार्गाकडे जाणारी वाहनेही याच रस्त्यावरून जाणार असल्यामुळे भविष्यात वाहतूकीची मोठी वाढ होईल.

भिवंडी ग्रामीण भागात मुंबई नाशिक महामार्गा लगत आशियातील सर्वात मोठे वेअरहाऊस हब तयार झाले आहे. येथे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय अशा सर्वच कंपन्यांचे गोडाऊन आहेत. त्यामुळे या परिसरात रोजगारासाठी मोठ्या संख्येने मुंबई उपनगर, कल्याण, ठाणे या परिसरातून चाकरमानी ये-जा करतात. त्याचबरोबर मुंबई व ठाणे शहरातील जागांच्या वाढत्या किंमतीमुळे माजिवडा ते पडघा दरम्यान गृहसंकुलांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या रस्त्यावरील खारेगाव, दिवे अंजुर, माणकोली, ओवळी, पिंपळास, रांजणोली, सरवली, सोनाळे, वालशिंद, येवई, वडपे, कुकसे, वाहुली, कुरुंद, पडघा या भागांमध्ये विकास होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरही मेट्रो सेवा सुरू केल्यास लाखो नागरिकांची सोय होईल. नियोजित भिवंडी-कल्याण भुयारी मेट्रो मार्गातील रांजणोली येथे इंटरचेंज स्टेशन उभारल्यास भिवंडी तालुक्यातील नागरिकांना वर्तुळाकार मेट्रो सेवा उपलब्ध होईल, असे कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.