प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवले!

आगीची अफवा: जळगाव रेल्वे दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू! ४० जखमी

जळगाव: पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवले. यामध्ये १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे ४० प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव-मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे. जळगावमध्ये लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा स्टेशनजवळ आग लागल्याची अफवा उडाल्यानंतर प्रवाशांनी अलार्म चेन खेचली आणि ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने जात असलेली कर्नाटक एक्सप्रेस गाडी तेथून जात होती. या गाडीने काही प्रवाशांना धडक दिली.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघातात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चार प्रवासी गंभीर जखमी आणि १६ किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना जळगावसह पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी, पोलिस अधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही मदतकार्यास सुरुवात केली. मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे.