बीसीसीआयच्या पंच मंडळात ठाण्याच्या मृगेश पानसरेचा समावेश

ठाणे: ठाण्याचा क्रिकेट पंच मृगेश पानसरेचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पंच मंडळात (अंपायर) समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयतर्फे नुकतीच राष्ट्रीय पातळीवर पंच परीक्षा घेण्यात आली होती. यात देशभरातून बीसीसीआयशी संलग्न असलेल्या विविध राज्य संघटनांकडून सुमारे 152 जण पात्र ठरले होते, त्यात मुंबईच्या चौघांचा समावेश होता. या परीक्षेत पहिल्या 20 जणांमध्ये मृगेशनं 13वा क्रमांक पटकावला.

बीसीसीआयच्या राष्ट्रीय पंच मंडळात एकूण 180 पंच असून त्यात मुंबई क्रिकेट संघटनेच्या 23 पंचांचा समावेश आहे. मृगेशनं 2019 मध्ये मुंबई क्रिकेट संघटनेची पंच परिक्षा दिली होती. पण त्यादरम्यान करोना महामारीमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं 2021 मध्ये मृगेशला पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता राष्ट्रीय पंच मंडळात समावेश झाल्यामुळं मृगेशला बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या स्पर्धामध्ये पंच म्हणून काम पाहता येणार आहे. विशेष म्हणजे एम. वाय. गुप्ते आणि विनीत गुप्ते या पिता-पुत्राच्या जोडीनंतर जवळपास 20 वर्षानंतर ठाणेकर क्रिकेट पंचाचा बीसीसीआयच्या पंच मंडळात समावेश झाला आहे.

लहानपणापासून उलट वर्तमानपत्रं वाचण्याची सवय असल्यामुळं स्पोर्ट्सच्या बातम्या वाचण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच मृगेशचा अंपायरचा प्रवास सुरु झाला. शिक्षण घेत असताना ही आवड सवयीत रुपांतरित झाली आणि या क्षेत्राला आपलं करिअर करण्याचा मृगेशनं निर्णय घेतला. जवळपास सर्वच वर्तमानपत्रं स्पोर्ट्सच्या बातम्यांना महत्त्व देतात आणि त्यामुळंच अनेक खेळाडू आणि खेळातून रोजगार उपलब्ध होतो याचं जिवंत उदाहरण मृगेश आहे.