युद्धाचा फटका : ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक दुबईत अडकले

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर तसेच मुरबाड तालुक्यातील २३ नागरिक २३ फेब्रुवारी २०२६पासून दुबई येथे फिरायला गेले होते. ते आज भारतात परतणार होते. परंतु अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात छेडलेल्या घमासान युद्धामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे विमान रद्द करण्यात येऊन विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी हे नागरिक दुबईतच अडकले आहेत.

दुबईत अडकलेल्या २३ नागरिकांना भारतात परतण्यासाठी मदतीची गरज आहे. या २३ नागरिकांमध्ये एकनाथ धनके (६७), गुलाब धनके (६२), शिवराम वाळिंबे (६३), शुभांगी वाळिंबे (५९), केशव वेखंडे (७०), कविता वेखंडे (६१), मधुकर पाटील (72), मीनाक्षी पाटील (64), बाळू गायकर (70), वनिता गायकर (68), दशरथ हरड (74), शारदा हरड (65), किसन मोहपे (70), मीरा मोहपे (62), रमेश धलपे (60), लता धलपे (52), वासुदेव शेलार (70), सपना शेलार (62), करुणा कापरे (59), अनिता धनके (71), तसेच टूर मॅनेजर मनीष सानप (49) यांचा समावेश आहे. यामध्ये 12 ज्येष्ठ नागरिक आहेत तर 12 महिलांचा समावेश आहे.

याबाबत त्यांनी भारतीय परराष्ट्रीय वकिलांना कळविले आहे, अशी माहिती दुबईला अडकलेले भारतीय नागरिक रमेश धलपे यांनी दिली. या सर्व 23 नागरिकांना तातडीने भारत देशात आणावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.