बाळासाहेब असते तर त्यांना वेदना झाल्या असत्या – राज ठाकरे

आज राज्यात, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे शिसारी आली. बाळासाहेब आज नाहीत हे त्यामुळे बरंच झालं, नाहीतर त्यांना वेदना झाल्या असत्या अशा भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी यापुढे मराठीच्या मुद्द्यावर कायम लढत राहू असे स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचं, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभे राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचित्रकार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर खूप काही घडायचं, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा.”

आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

जुनी आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणं हे माझ्यासाठी नव्हतं, ते घर सोडणं होतं. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. झालं गेलं ते आता सोडून द्या एकदा.”