खा.नरेश म्हस्के यांचे वक्तव्य
ठाणे: बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते असून दोघेही लोकप्रिय नेते आहेत, ते जर भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ का? असा प्रश्न करत महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी एकत्र येतील याची वाट बघत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. म्हस्के यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जात आहेत.
मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे जरी गुलदात्यात असले तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठे विधान केले आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
खा. म्हस्के म्हणाले, हे दोघे ज्या दिवशी एकत्र येतील, त्या दिवशी मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा असेल. मराठी माणसाच्या विकासाचा तसेच महाराष्ट्राच्या विकासाविषयी महाराष्ट्राचे नेते एकत्र येणे गरजेचे आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे आणि मंडळींनी केले आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणून लढल्या, सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. एकनाथ शिंदेनी यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना बाहेर काढण्याचे काम केले. धनुष्यबाण हिंदुत्वाच्या विचारांचा आहे हे जगाला पुन्हा एकदा दाखवून दिले असल्याचे म्हस्के म्हणाले.
या भेटीनंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले असतील तर त्यांचे स्वागत आहे. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत. परंतु राज ठाकरे जर एकनाथ शिंदे यांना भेटले आणि काही लोकांचा पोटशूळ उठणार असेल तर त्यांना उत्तर देणे आवश्यक असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.