टीडीआरच्या ओझ्याने मोडणार घोडबंदर, मुंब्रा-दिव्याचे कंबरडे

मर्यादित भूखंडामुळे जुन्या ठाण्याचा सुस्कारा

ठाणे : चितळसर-मानपाडा येथील लाखो चौरस मिटर निर्माण झालेल्या टीडीआरचा वापर जुन्या ठाण्यातील मर्यादित भूखंडामुळे वापरणे शक्य नाही. त्यामुळे आधीच नागरी सुविधाची बोंब असलेल्या घोडबंदर आणि नव्याने विकसित होत असलेल्या मुंब्रा दिवा भागात हा टीडीआर वापरला जाणार असल्याने या भागातील नागरी सुविधांच्या कामावर ताण येणार आहे. विशेष म्हणजे या भागातील भूमिपुत्रांच्या टीडीआरला देखिल कवडीमोल भाव मिळणार आहे.

चितळसर-मानपाडा येथील विकास हस्तांतरण प्रकरणात संबंधित कंपनीला सात लाख ४० हजार चौरस फुट एफएसआयची खैरात ठाणे महापालिकेकडून करण्यात आली. ज्या जागेवर हा एफएसआय देण्यात आला आहे, त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नसल्याची कबुली स्वतः पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात दिली आहे. त्यामुळे हा एफएसआय भविष्यात वापरायचा झाल्यास या एफएसआयचा वापर प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि शीळ परिसरात होण्याची जास्त शक्यता आहे.

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून शहरात लाखो घरांची निर्मिती होणार त्यामुळे ठाण्याची लोकसंख्या तब्बल ४३ लाखांपर्यंत पोहोचू शकते. परिणामी शहराच्या मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण पडणार आहे. सध्या ठाणे शहरात पाणीटंचाई, वाहतूककोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक, आरोग्य सुविधा, खेळाची मैदाने, शाळांची कमतरता आणि पर्यावरणीय समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. मुंब्रा, दिवा, शीळ आणि घोडबंदर रोडवर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत लाखो नवीन नागरिक शहरात दाखल झाल्यास नागरी समस्या गंभीर होणार आहे.

घोडबंदर रोड हा आधीच वाहतूककोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे. सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मेट्रोचे काम सुरू असले तरी भविष्यातील लोकसंख्येच्या तुलनेत ते पुरेसे ठरेल का, हा प्रश्न कायम आहे. जर याच परिसरात मोठ्या प्रमाणावर एफएसआयचा वापर करून उंच इमारती उभारल्या गेल्या, तर रस्त्यांवरील वाहतूक आणखी विस्कळीत होईल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाढेल घोडबंदरच्या नियोजनच अक्षरशः बोजवारा उडणार आहे.

दिवा, मुंब्रा आणि शीळ परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा भाग वेगाने विकसित होत असला तरी रस्ते, मलनिस्सारण, आरोग्य केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक वाहतूक या सुविधा अद्यापही अपेक्षित प्रमाणात विकसित झालेल्या नाहीत. बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी या सुविधा उभारणे आवश्यक असते. अन्यथा विकासाचा संपूर्ण भार स्थानिक प्रशासनांवर पडणार आहे.

टीडीआर ही संकल्पना विकासासाठी उपयुक्त असली तरी तिचा वापर नियोजनबद्ध आणि संतुलित पद्धतीने होणे आवश्यक आहे. केवळ बांधकाम वाढविणे म्हणजे विकास नव्हे. त्याच प्रमाणात रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज, सार्वजनिक वाहतूक, रुग्णालये, शाळा, उद्याने आणि अग्निशमन सुविधा वाढविणेही आवश्यक आहे, असे मत जागरूक नागरिकांनी व्यक्त केले आहे.