ठाणे: मागिल अनेक वर्षे बंद स्थितीत असलेला नितीन कंपनी येथील सिग्नल आजपासून सुरू झाल्याने या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
नितीन कंपनी येथील मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावर कामगार हॉस्पिटल, इंदिरानगर, वागळे, लोकमान्य, लुईसवाडी आणि वैतीवाडी या भागातील वाहनचालकांना ठाण्याकडे येण्यासाठी आणि पाचपाखाडी, ठाणे शहरातील नागरिकांना वागळे परिसरात जाण्यासाठी नितीन कंपनी चौकातून जावे लागत आहे. सेवा रस्त्यावर कोरम मॉल तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियोजन करावे लागत होते. ते करताना त्यांची दमछाक होत होती. या ठिकाणी मुंबईकडे जाणारी आणि नाशिककडून ठाण्यात येणारी वाहने चौकात सिग्नल नसल्याने पुढे जाण्याच्या चढाओढीत चौकात वाहतूक कोंडी होत असे, परंतु आता सिग्नल सुरू केल्याने वाहन चालक शिस्तीत वाहने चालून या चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल असे अनेक वाहनचालकांनी सांगितले.
हा सिग्नल देखील दोन मिनिटांचा आहे, त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहून ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर या चौकात होणारे अपघात आणि वाहनचालकांचे वाद देखील कमी होतील, असे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.