भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची भीती
ठाणे: उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात नालेसफाई समाधानकारक न झाल्याने पहिल्याच पावसात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग समितीच्या हद्दीत अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा उचलून नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. तर अनेक नाल्यांमध्ये अजूनही प्लॅस्टिक कचरा व गाळ साचलेला आहे. या संदर्भात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घनकचरा विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांनाही जुमानत नसून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे. येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी नाल्यालगत ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पहिल्याच पावसात उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पूर येण्याची भीती आहे. त्यामुळे नालेसफाई करण्याबरोबरच नाल्यालगत ठेवलेला गाळ उचलावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.