नवी मुंबई: सायन-पनवेल महामार्गांवरील मागील काही महिन्यांपासून गटारांची झाकणे गायब होण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने गटारांचे चेंबर खुले राहत आहेत. त्यामुळे यात एखादे वाहन अडकून अपघात झाल्यास वाहन चालकाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे सदर ठिकाणी झाकणे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भरधाव वेगासाठी आणि अतिशय वर्दळीचा मार्ग अशी सायन-पनवेल महामार्गाची ओळख आहे. कारण या मार्गावरून रोज बंगलोर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याकडे हजारो वाहने जात असतात. तितकीच वाहने मुंबईकडे येत असतात. मात्र सध्या सानपाडा येथे हा मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक झाला आहे. सानपाडा उड्डाणपुलाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील गटारांची झाकणे गायब होत आहेत. त्यामुळे या ठिकाणची चेंबर खुली पडले आहेत. या ठिकाणी साधारण सात ते आठ चेंबर खुले असून त्यांची खोली पाच ते सहा फूट आहे. त्यामुळे या चेंबरमध्ये एखादे वाहन, दुचाकी पडून अपघात झाल्यास वाहन चालकाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे या ठिकाणी झाकणे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.