३६ तास नंतरही ठाण्यात पाण्याचा ठणठणाट

ठाणे : जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीसाठी हाती घेतलेल्या कामामुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा अपेक्षेपेक्षा अधिक काळ खंडित राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. महापालिकेने जाहीर केलेल्या २४ तासांच्या पाणीबंदीनंतरही काम पूर्ण न झाल्याने हा कालावधी ३६ तासांवर गेला. परिणामी, शहरात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे.

माजिवडा जंक्शन परिसरातील मुख्य जलवाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. याशिवाय शहरातील इतर भागांतील अंतर्गत जलवाहिन्यांमधील गळतीही दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कामादरम्यान तांत्रिक अडचणी आल्याने नियोजित वेळेत काम पूर्ण होऊ शकले नाही. रविवारी सायंकाळपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी अनेक भागांत तो अत्यल्प दाबाने होत आहे. त्यामुळे टाक्या पूर्ण भरत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे गृहसंकुलांमधील पाण्याचा साठा संपला असून अनेक ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. टँकरद्वारे मिळणारे पाणीही अपुरे पडत असल्याने नागरिकांना काटकसर करून पाणी वापरावे लागत आहे. झोपडपट्टी व चाळी भागांमध्ये तर परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. मात्र, उपलब्ध पुरवठा आणि प्रत्यक्ष गरज यामध्ये तफावत असल्याने आधीच ताण असलेल्या यंत्रणेवर अशा दुरुस्ती कामांचा अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी जलवाहिन्यांची नियमित देखभाल आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.