निवडणूक लेट, अंबरनाथला शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लेट झाली असली तरी शिवसेनेचा थेट नगराध्यक्ष होणार, असा दावा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत उप मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. निवडणुका जरी लांबल्या असल्या तरी शिवसेना उमेदवारांच्या कामगिरीचा आलेख वाढला असून नगराध्यक्षाचे मताधिक्य हमखास वाढेल आणि त्याचा विरोधकांना जोर का झटका बसेल, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने अंबरनाथला विकास कामे केली आहेत. कालही शिवसेना होती, आजही आहे आणि उद्याही राहील, शिवसेनेचे सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पूर्वीपासून ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे यंदाही नगरपालिकेवर भगवा फडकणार आहे. विकासकामे झाली ते नागरिकांसमोर आहे, विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचे नाव कोरले आहे. पुढील निवडणुकीत कोणी उभे राहण्याचे धाडस करू शकणार नाही, विकास कामांना आर्थिक ताकद देण्याचे काम केले यापुढेही देणार यात शंका नाही, असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

वडवली येथील प्रचार सभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचीही भाषणे झाली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

* सोमवारपासून नव्या इमारतीत नवीन नगरसेवक विकास कामे करतील
* चिखलोली स्टेशन लवकरच सुरू होणार
* मेडिकल कॉलेज झाले
* मोफत आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न
* अंबरनाथला क्लस्टर विकास योजना राबवू