रिक्षातील प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी
डोंबिवली : भरधाव वेगात चारचाकी वाहन चालवत आठ ते नऊ जणांना धडक देऊन जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिम येथे घडली. या घटनेत रिक्षातील प्रवासी आणि दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. धडक देणाऱ्या वाहन चालकाचा काही नागरिकांनी पाठलागही केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर जाधव याच्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव हे दुचाकीवरून डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर म्हात्रे चौकच्या दिशेने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने (एमएच ०५ डीके ०९११) जोरदार धडक दिली. जाधव यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून वाहनचालकास जाब विचारला असता वाहनचालकाने मादक पदार्थाचे सेवन केले होते असे फिर्यादीत म्हटले आहे. या वाहनचालकाने जाधव यांना पट्ट्याने मारहाण करून गाडी घेऊन निघून गेला. पुढे महाराष्ट्र नगर, नवापाडा मारुती मंदिर, लोकप्रिय विद्यालय, दोन पाण्याची टाकी, उमेशनगर परिसरात याच गाडीने एका रिक्षाला चार ते पाच दुचाकींना धडक दिली. विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील दोन दुचाकींनाही धडक दिली. यात रिक्षातील प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी झाले. हा सर्व प्रकार नागरिकांनी पहिला असून चारचाकी वाहनचालकाला अटक करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.