सुरक्षितता ऐरणीवर 

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे. मृत प्रवाशांच्या मन हेलावणाऱ्या कथा ऐकून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघातामागचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. ब्लॅक-बॉक्स सापडल्याने ते उघडकीस येईल. परंतु त्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो. विमान दुर्घटनांचे प्रमाण आणि त्यात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या हे तुलनेने रस्त्यावरील अपघातांपेक्षा कमी असते. भारतात दररोज रस्त्यांवरील दुर्घटनेत ४७४ माणसे दगावत आहेत. अर्थात त्यामुळे विमान दुर्घटनेमागची कारणे शोधण्याचे कार्य गांभीर्याने आणि निर्धारित वेळेत (३० दिवस) पूर्ण करावे लागेल. दरम्यान या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत वेगळ्या स्तरावर चौकशी सुरु झाली असणार. भारताकडे सर्व जगाचे लक्ष आहे. असूया आणि मत्सर वाटणाऱ्या शत्रूंची संख्या वाढत आहे आणि अतिरेक्यांच्या मदतीने भारतात अशांतता निर्माण करण्याचा डावही अशा अपघातांमागे असू शकतो.

या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक सुरक्षितता या विषयावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एअर एशियाचे भूतपूर्व सुरक्षाप्रमुख अमित सिंग यांचा या दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेला लेख अनेक त्रुटींबाबत चिंता व्यक्त करीत आहे. भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेचे अवलोकन केले असता आपण या आघाडीवर फक्त ५७.३४ टक्के कामगिरी बजावू शकलो आहोत. या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघात होत असतील तर तो निश्चितच चिंतेचा विषय बनतो. विमानाने प्रवास करण्याकडे वाढलेला कल आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी विमान कंपन्यांनी केलेला विस्तार यामुळे विमानतळांवर बोजा वाढला आहे. त्याचा परिणाम सुरक्षा नियमावलीच्या पालनावर होत असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुरक्षिततेचे निकष पाळण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, तेवढे मनुष्यबळ वगैरे बाबींचाही अपघाताची कारणमीमांसा करताना विचार करावा लागेल.

प्रत्येक क्षेत्राची एक कार्यसंस्कृती असते. हवाई वाहतुकीस रेल्वे सुरक्षिततेचे निकष लागत नसतात. त्यासाठी मुळात भारतामध्ये जीवाचे मोल आणि त्याचे संरक्षण हे विषय सार्वजनिक जीवनात जवळजवळ ‘ऑप्शन’ला टाकले जातात. साधा रस्ता ओलांडताना किंवा रांगेत उभे राहण्याचा विषय आपली वृत्ती उल्लंघन करण्याची बनली आहे. डावीकडून ओव्हरटेक करणे असो की सिग्नल मोडणे, या दैनंदिन चुकांची आपण जणू सवय लावून घेतली आहे. विमान अपघाताशी यांचा खचितच संबंध नाही, परंतु यदाकदाचित चौकशीमध्ये शिस्त मोडल्याचे वा हेळसांड झाल्याचे पुढे आले तर त्यास भारतीयांची ‘चलता है’ वृत्तीच कारणीभूत असेल. आपली ही वृत्ती एकावेळी २५० जीव घेऊ शकते, हे कधी लक्षात घेणार आहोत आपण?